उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ले तर काय होईल?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:21

उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ले तर काय होईल?
उघड्यावरचे खाणार, त्याला आजार होणार

पावसाळ्यात खमंग वास आला की मोह आवरत नाही. रस्त्यावरच्या खाण्याचाही मोह थांबत नाही. भजी, वडापाव, चहा या पदार्थाची मागणी वाढते. हे पदार्थ खाताना स्वच्छतेचा विचार कोणाकडूनच केलेला दिसत नाही. त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळते. हल्ली बाहेरचे खाण्याकडे कल वाढतो आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हॉटेलात खाणाऱ्यांची कमतरता नाही. त्यामुळे पचनसंस्थांशी निगडित आजार घेऊन रुग्णालय गाठण्याची वेळ नागपूरकरांवर आली आहे. पावसाळ्यात पोटाशी निगडित आजारांना बहुतांश वेळा दूषित पाणी, उघड्यावरचे अन्न पदार्थ कारणीभूत असतात. शहरातल्या झोपडपट्ट्यांतही याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे उघड्यावरचे खाणार त्याला आजार नक्कीच होणार, असे सध्याचे चित्र आहे.

पावसाळ्यात जीवजंतूंना पोषक दमट वातावरण तयार होते. त्यात उघड्या विहिरींच्या पाण्यात हे जंतू बऱ्याचदा आढळतात. मुख्य म्हणजे मानवी किंवा प्राण्यांची विष्ठा व पिण्याचे पाणी यांचा संबंध आला तर हे आजार उद्भवतात. कूपनलिकांमुळे मात्र या आजारांचे प्रमाण घटले आहे. हे सर्व आजार सूक्ष्मजंतूंमुळे (जिवाणू, अमिबा, विषाणू) होतात. हे सूक्ष्मजंतू रुग्णाच्या विष्ठेतून येतात. हे जंतू हाताने, अन्नावाटे; पाण्यावाटे वा माशीच्या संपर्काने पसरतात. यासाठी हातांची, भांड्यांची स्वच्छता, नखे कापणे, अन्न सुरक्षित ठेवणे, इत्यादी काळजी घेणे आवश्यक आहे.

उघड्यावरच्या घाणीवर किटाणू, माशा, बारीक बारीक कीटक घोंघावत असतात. हेच जंतू उघड्यावरील पदार्थांवर बसल्यानंतर त्यांच्यामार्फत सूक्ष्म किटाणू अन्नपदार्थांवर राहून जातात. ते तोंडामार्फत पोटात गेल्यानंतर यातले परजीवी किटाणू शरीरातल्या पचनक्रियेत अडथळे निर्माण करतात. मुख्यत्वे रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांच्या नाल्यांवर खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स उभे असतात. पावसाळ्यात आजार पसरवणारे अनेक घटक असतात. ते या खाण्यामार्फत पसरू शकतात. स्टॉलच्या आजूबाजूला किती स्वच्छता असते, हे तपासण्याची गरज आहे. नियमित पाणीपुरवठा नसणाऱ्या परिसरात हे स्टॉलधारक अस्वच्छ पाणी वापरतात. गेल्या काही वर्षांत याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. पावसाळा हा आजारांना आमंत्रण देणारा ऋतू असल्याने अशा स्टॉलवर खाल्ल्याने अनेक संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात माशांचा फैलाव जास्त असतो. या माशा उघड्या पदार्थांवर बसतात. परिणामी, माशांमुळे अनेक रोग उद्भवण्याची शक्यता आहे.

निदान पावसाळ्यात तरी रस्त्यावरील स्टॉलवर खाणे टाळल्यास संभाव्य आजारांपासून आपण दूर राहू शकतो. कारण, पावसाळ्यात आजार पसरण्याची जास्त शक्यता असते. या खाण्यामधून विषबाधा होण्याचीही शक्यता असते. पावसाळा सुरू झाल्यापासून रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे उघड्यावरचे खाताना तेथील स्वच्छता लक्षात घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.

पावसाळ्यात पाणी शक्यतो उकळून प्यायलेले योग्य असते. उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळले तर जंतुसंसर्ग होण्याची जोखीमही कमी होते. पावसाळ्यातच नव्हे तर केव्हाही बाहेरचे खाणे टाळलेच पाहिजे. पावसाळ्यात माशांचा प्रादुर्भाव जास्त होत असल्याने रोगराई पसरते. त्यामुळे उघड्यावरचे खाणे शक्यतो टाळा. पावसाळ्यात जिभेच्या चोचल्यांना आवर घालणेच योग्य आहे.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info